PM Kisan Mandhan Yojana: देशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असतात. अनेक शेतकरी शेती किंवा मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात आणि वयाच्या पुढील टप्प्यात पोहोचल्यानंतर, त्यांच्या जीवनात आर्थिक स्तरावर अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात.
भारतातील शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली आहे. पंतप्रधान किसान मानधन योजना ही एक सरकारी पेन्शन योजना आहे जी भारतातील शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन देण्यासाठी राबवली जाते.
भारत सरकारच्या पंतप्रधान किसान मानधन योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी अर्ज करू शकतात आणि गुंतवणूक सुरू करू शकतात. तुम्ही या योजनेसाठी अर्ज करता तेव्हा तुमचे वय किती आहे यावर आधारित गुंतवणुकीची रक्कम ठरवली जाते. गुंतवणुकीची रक्कम 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत असू शकते.
शेतकऱ्यांनी वयाच्या 18 व्या वर्षी प्रधानमंत्री किसान पेन्शन योजनेसाठी अर्ज केला असेल तर त्यांना या योजनेत दरमहा 55 रुपये प्रीमियम भरावा लागेल. तसेच गुंतवणूक करणारा शेतकरी 60 वर्षांचा झाल्यावर, त्याला दरमहा 3,000 रुपये (वार्षिक 36,000 रुपये) पेन्शन मिळेल.
शेतकरी पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला मिळणारी पेन्शन त्यांच्या पतीच्या पेन्शनच्या 50 टक्के असेल. उदाहरणार्थ, जर शेतकरी पतीचे पेन्शन दरमहा 3000 रुपये असेल, तर त्यांची पत्नीला दरमहा 1500 रुपये पेन्शन मिळेल. जर तुम्हाला या नवीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.
तसेच प्रधानमंत्री किसान मानधन या योजनेचा लाभ 2 हेक्टर व त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मिळतो. भारत सरकारची प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही एक महत्त्वाची योजना आहे जी शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत करते. देशभरातील या योजनेत अनेक शेतकरी अर्ज करत आहे आणि गुंतवणूक करत आहे.